Home मराठी बातम्या कायदा आणि सुव्यवस्था ‘एस’ विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे – बीएमसी

‘एस’ विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे – बीएमसी

'एस' विभागातील डोंगर उतारावर राहणा-यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरीत व्हावे - बीएमसी

मुंबई, 20 मे (हिं.स.) : ‘एस’ विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर, गौतमगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्यादरम्यान जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच डोंगरावरुन येणाऱया पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यामुळे, तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाश्यांची जबाबदारीवर त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे सहायक आयुक्त ‘एस’ विभाग यांच्या वतीने कळविण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published.